सप्टेंबर मध्येही शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत


राज्यातील कोरोना साथीची परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याने राज्यातील लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याची घाई झाली आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली, याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तिला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही.
   सध्या महाराष्ट्रात कोरोनाची पहिलीच लाट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. दुसरी लाट ही कंबरडे मोडणारी असून, त्यामुळे ही लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसल्याचं मी जाणून आहे. जर शाळा सुरू झाल्या तर शाळेत कोरोनाचा संसर्ग फैलावला किंवा कार्यालये उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या